मुंबई – मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला गेला. या सामन्यात आणखी एका विक्रम विराट कोहलीने आपल्या नावे केला. मायदेशात खेळताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला.
आणखी एका ‘विराट’ विक्रमाला कोहलीची गवसणी
वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने हा विक्रम नोंदवला. १३ व्या षटकात षटकार ठोकून त्याने या विक्रमाला गवसणी घातली. विराट असा कारनामा करणारा जगातील तिसरा खेळाडू आहे. टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी मायदेशात १ हजार धावांचा टप्पा न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील आणि कॉलिन मुन्रो यांनी पार केला आहे. दोघांनी मायदेशात खेळताना आतापर्यंत अनुक्रमे १४३० आणि १००० धावा केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहलीने या सामन्यात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत आपले नाव नोंदवले. २१ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले आणि या यादीत पाचवे स्थान मिळवले.