नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून मंगळवारी राज्यसभेत नोटाबंदीनंतर चलनात आलेली २००० ची नोट रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांमध्ये ही नोट बंद होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण सरकारच्या स्पष्टीकरणानंतर आता ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२००० ची नोट रद्द करण्याच्या निव्वळ अफवा; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
मंगळवारी राज्यसभेत याबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले. २००० ची नोट रद्द होणार नसल्यामुळे कुठलीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. २००० ची नोट रद्द करण्याची सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये उपस्थित करण्यात आला होता, केंद्र सरकारकडून त्याला लेखी उत्तर देण्यात आले.
दरम्यान, हा प्रश्न समाजवादी पार्टीचे खासदार विश्वंभर प्रसाद निशाद यांनी उपस्थित केला होता. चलनात २००० ची नोट दाखल झाल्यामुळे काळ्या पैशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार ही नोट रद्द करुन पुन्हा १००० ची नोट चलनात आणत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरु आहे, असे निशाद यांनी म्हटले होते. यावर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिले.