मुंबई : विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली. राज्यातील सत्तासंघर्षानंतर महायुतीचे सरकार गेले आणि भाजपशी जुनी मैत्री तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा केला. महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर सुटला आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली आणि अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण शिवसेना जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या सर्व प्रकरणानंतर केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे हेच चांगले असल्याचे मला तरी वाटते. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप कोणत्याही क्षणी एकत्र येतील, उद्धव ठाकरे योग्य वेळी भाजपसोबत जाण्याबाबतचा निर्णय घेतील, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. पण दोन्ही पक्षांना सद्यस्थितीत ते मान्य नसल्याचे दिसत असल्याचेही मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, छोट्या मोठ्या गोष्टीवरुन झगडा करण्यापेक्षा काही गोष्टी सहन कराव्या.
काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील त्या सांगाव्यात. एकत्र काम केले तर ते दोघांच्याही फायद्याचे ठरेल. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळी मते गोळा करण्याच्या निमित्ताने किंवा आपला पक्ष पसरवण्याच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसे सध्या शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झाले आहे. याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर कधीच जाणार नाहीत असे नाही. उद्धव ठाकरे योग्य वेळ येताच योग्य निर्णय घेतील, असे मनोहर जोशी यावेळी म्हणाले.
पण मनोहर जोशींच्या या वक्यव्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खंडन करत, ते मनोहर जोशी यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या जेष्ठ पिढीच्या अशा भावना स्वाभाविक असल्या तरी अशीच कोणतीच भूमिका शिवसेनेची नाही. तसेच सध्याचे भाजपचा मार्ग व व्यवहार सहकारी मित्र पक्षांना संपवण्यासाठी असल्याने त्या मार्गाला स्विकारणे शिवसेनेला शक्य नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची लोकशाही विकास आघाडी मजबुत असून ते जनतेशी प्रामाणिकपणे बांधीलकी ठेऊन काम करत असल्याचेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.