महाराष्ट्रात ८० तासांचे सरकार चालविल्यानंतर राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पुन्हा एकत्र दिसले. या दोघांच्यात गप्पा रंगल्या होत्या. सरकार पडल्यानंतर प्रथमच हे दोघे एकत्र दिसले. या संदर्भात सोमवारी अजित पवार याना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारत होतो असे उत्तर दिले. अजित दादा आणि फडणवीस सोलापूर येथील आमदार संजय शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित होते आणि तेथेच या दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या.
पुन्हा भेटले अजित पवार आणि फडणवीस
बारामती येथे बोलताना अजित पवार म्हणाले, लग्नात एकत्र बसलो कारण आमची बसायची व्यवस्था शेजारी शेजारी केली होती. आम्ही बोलत होतो यांचा अर्थ नवीन काही शिजतेय असा काढू नका. आम्ही हवापाण्यावर गप्पा मारल्या. आणि राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो.
गेल्याच आठवड्यात फडणवीस यांनी सरकार बनविण्यासाठी अजित पवार यांनीच संपर्क साधला होता असा दावा केला होता. याचवेळी फडणवीस यांनी शरद पवार जात कार्ड खेळले असा आरोप केला. ते म्हणाले, जात काही राजकीय नेत्यांसाठी महत्वाचा मुद्दा असू शकते पण जनतेसाठी हा महत्वाचा मुद्दा असू शकत नाही.