शिवसेना खासदाराने नारायण राणेंचा “पनौती” म्हणून केला उल्लेख


सिंधुदुर्ग : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीका करताना त्यांचा पनौती असा उल्लेख केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी भाजप नेते नारायण राणेंच्या पनौतीमुळे घसरली. त्या नारायण राणेंनी ती सावरता येते का हे पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी स्वत:चा विचार जरुर करावा, असे म्हटले आहे.

आयुष्यभर ज्याने ठेकेदारी केली. दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापता कापता बाळासाहेबांच्या कृपेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले. त्या नारायण राणेला आता त्यांच्या अज्ञातवासामध्ये त्यांचा भूतकाळ आठवत असल्यामुळे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना कसे फसवले, चिटींग कशी केली हे सर्व आठवत असताना त्यांची बडबड, मुक्ताफळे सुरुच असतात. त्यामुळे आम्ही त्यांची दखल घेत नसल्याचा टोलाही राऊतांनी राणेंना लगावला.

कोकणातील जनतेने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे त्यांनी वनवासात जावे आणि शेवटचे आयुष्य हरि नामामध्ये मार्गक्रमण करावे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्यामुळे राणेंच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला कोणतीही बाधा होणार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार हे एक आदर्श सरकार बनेल. त्याचे अनुकरण आतापासून अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही त्या सरकारकडे अभिमानाने पाहत असल्याचेही विनायक राऊत म्हणाले.

Leave a Comment