नवी दिल्ली – इंडिया टुडे मॅगजिनमध्ये लिहिलेल्या ‘How to fix the economy’ या लेखात रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही, तर भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचे काम करेल असे मत व्यक्त केले आहे.
राजन यांनी मोदी सरकारच्या सामाजिक आणि राजकीय धोरणांसंबंधी बोलताना, राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे सरकारने उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठांची निर्मिती केली पाहिजे. यामुळे लहान मुलांना चांगले शिक्षण देत त्यांना सहिष्णू आणि इतरांप्रती आदर व्यक्त करणारे म्हणून घडवण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर ते उद्याच्या स्पर्धात्मक जगात स्वत:चा टिकाव धरु शकतील, असे म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारमध्ये जे असतात त्यांच्यात अजून सत्ता मिळवण्याची तसेच नियंत्रण करण्याची सवय पाहिली जाते. त्यासाठी हे सरकारही अपवाद नाही.
भारताच्या आर्थिक विकासाला आहोटी लागली असून, आजाराची लक्षणे अर्थव्यवस्थेत दिसू लागली आहेत. पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण आणि अधिकारहीन मंत्री ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अशा अवस्थेत अपायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. निर्णय, कल्पना, योजना या सर्वच पातळ्यांवर सध्याच्या सरकारमध्ये केंद्रीकरण झाले आहे. सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातील काही लोक घेतात. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा त्यांचे निर्णय उपयुक्त ठरत असतीलही, पण आर्थिक सुधारणा यात बाजूला ठेवल्या गेल्या आहेत. देशपातळीवर देशाची अर्थव्यवस्था कशी काम करते यापेक्षा राज्यांच्या पातळीवर कशी काम करते याचे ज्ञान संबंधित तज्ज्ञ व्यक्तींना नसल्यामुळे त्यांनी आखलेला कार्यक्रम अर्थव्यवस्थेसाठी सुसंवादी नसल्याची टीका रघुराम राजन यांनी केली आहे.