गायींचे हिंदू ठेकेदारच गाय कापायला पाठवतात – मोहन भागवत


पुणे – पुण्यात आयोजित गो-विज्ञान संशोधन संस्थेच्या कार्यक्रमासाठी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी गाय कापली जाते ही समस्या नसून आपण गायीला माता मानतो अशी श्रद्धा असतानाही गाय पाळायला कोणीही तयार नाही ही मुळ समस्या आहे. गायींचे ठेकेदार हिंदूच असून गाय कापायला तेच पाठवतात. गोवंश आपण वाचवला. आता त्यांच्या खाण्यापिण्याचे काय? 45 हजार गायी कापल्या जाण्यापासून वाचवण्यात आल्या आहेत. गाईला माता मानणाऱ्या या देशात आपल्या कुटूंबात कुणी गाय सांभाळू शकत नाही का? असा सवाल उपस्थित केला.

गायीच्या महत्वाची पारंपरिक आणि वैज्ञानिक सांगड त्यांनी घातली, कत्तलीपासून गायींना आपण वाचवले. त्यांना आता जगवायचे कसे? असा प्रश्न आहे. गाय ही पाश्चिमात्य जगतात उपभोगाची वस्तू मानली जाते. तिला भारतात आपण गोमाता म्हणतो. कारण निसर्गावर, मातीवर, मनुष्यावर आणि मनुष्याच्या स्वभावावर देखील गाय परिणाम करते, असे आम्ही मानतो. केवळ दुधासाठी गाईचे पालन आम्ही करत नाही. गाय, गोमूत्र आणि शेण यांच्यातून भोवतालच पावित्र्य राखले जाते. विज्ञाननिष्ठ आमचे आचरण असले पाहिजे. विज्ञाननिष्ठ विचार करतो म्हणूनच आम्हाला गाय विश्वमाता वाटते, असे ते यावेळी म्हणाले.

आम्हाला गोसंवर्धन, गोपालन कसे करायचे याचे उदाहरण उभे करायचे आहे. सगळ्यांनी त्यासाठी एकत्रित तसेच सर्वंकष प्रयत्न करणे गरजेचे आहे. गायीच्या बाबतीत समाज जागृत झाला तर गाय कापायला कोणीही पाठवणार नाही. हिंदूच आज गाय कापायला कत्तलखान्यात पाठवतात, हिंदूच गायींचे ठेकेदार असल्यामुळे प्रत्येक घर गोपालक झाले पाहिजे. प्रत्येक घर गायीचे संरक्षक बनले पाहिजे. सर्व समाज जागा झाला तरच गायीची समस्या मुळापासून संपुष्टात येईल असे मत भागवत यांनी मांडले.

Leave a Comment