मुंबई – शुक्रवारी पहाटे 3 च्या समुमारास हैदराबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एनकाउंटरमध्ये खात्मा करण्यात आल्यानंतर देशभरातून यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. एनकाउंटरच्या बाजूने काहीजण बोलत होते तर काहीजण त्याच्याविरुद्ध बोलत होते. त्यातच आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. फाशीची शिक्षा जर होत नसेल तर एनकाउंटरच योग्य असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या देशात वारंवार घटना घडत आहेत. ते सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच आहे. हैदराबादमधील घटनेत आरोपी पोलिसांवर प्रतिहल्ला करून पळून जात होते. त्यांचे त्या परिस्थितीत झालेले एन्काऊंटर योग्य आहे. अशीच अत्याचाराची घटना दिल्लीतही पूर्वी घडली होती. त्यातील आरोपींना अद्याप फाशी झाली नसल्याचेही अण्णा हजारे म्हणाले. हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी अनेकांकडून संशय व्यक्त केला जात असताना अण्णा हजारे यांनी ही थेट भूमिका घेतली आहे.