महाविकास आघाडीचे नारायण राणेंकडून नामकरण


मुंबई – निवडणुकीच्या निकालानंतर साधारण महिनाभर राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. पण या सरकारवर भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. सत्तेत आल्यापासून या सरकारने केवळ विकासकामांना स्थगिती देण्याचेच काम केले असल्याने ‘स्थिगिती सरकार’ असे त्यांनी या सरकारला संबोधले आहे. शिवाय हे सरकार पाच वर्ष देखील टीकणार नाही. काही महिन्यांचे पाहुणे सरकार असल्याचे देखील त्यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले आहे.

मी निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच दिवसांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. राज्यातील परिवर्तन किंवा बदल आणि या बदलामुळे कोकणाच्या विकासावर होणारा परिणाम याचबरोबर सिंधुदुर्गांतील ठप्प झालेली विकास कामे, यावर प्रकाश टाकण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे त्यांनी सुरूवातीला स्पष्ट केले. यानंतर राणे म्हणाले, महाराष्ट्रात नवीन सरकारचा २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाला. आज ८ डिसेंबर आहे. पण अद्याप खातेवाटप होऊ शकलेले नाही. एवढच नाहीतर मंत्री देखील ठरलेले नाही. जे सरकार तीन पक्षांचे मिळून अस्तित्वात आले आहे, मी त्या सरकारला नावे दिले आहे ते म्हणजे ‘स्थगिती सरकार’. कारण मागील दहा दिवसांत या सरकारने एकच काम केले आहे व ते करत आहेत.

राज्यात मेट्रोसासरखी अन्य विकासकामे सुरू आहेत. या सरकारने मागील दहा दिवसांत या विकासकामांना स्थिगिती देण्याचे काम केले असल्यामुळे विकासकामे बंद पडलेली आहेत, ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे हे सरकार राज्यात प्रगतीसाठी अस्तित्वात आले नसून, कामे बंद करायची ठेकादारांकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व चालेले आहे. दीर्घकाळ हे सरकार चालणार नाही. काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे.

या सरकारचे अस्तित्व अद्याप कोकणात कुठे दिसत नाही. कोकणातील विकास कामे ठप्प झालेली आहेत. याला संपूर्णपणे जबाबदार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र आले ते जनतेसाठी किंवा शेतकरी, कामगार उद्योजक यांच्या हितासाठी आलेले नसून ते केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले असल्यामुळे नक्कीच विकासावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आढावा बैठका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदाराने घेतल्या, अशा आढावा बैठक खासदार कोणत्या अधिकारात घेतो, केंद्रात भाजपचे सरकार असून त्यामध्ये शिवसेना नाही. सत्तारूढ पक्षाचा खासदार नसताना, शासकीय अधिकाऱ्यांना आदेश कसे काय दिले जाऊ शकतात? केवळ बेकायदेशीररित्या बैठका घेऊन आम्ही काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे.

आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी १५ ते १८ डिसेंबर रोजी आठही तालुक्यात गाव भेटी घेणार आहोत. या निडवणुकीत भाजप सरकार का स्थापन करू शकले नाही, तीन पक्षांच सरकार कसे योग्य नाही, राज्याला अधोगतीकडे नेणारे हे सरकार आहे ही माहिती जनतेला दिली जाणार आहे. तसेच या सरकारने पर्यटन क्षेत्राच्या ज्या योजनांना स्थगिती दिली आहे, त्याविरोधात आवाज उठवला जाईल, असा देखील राणे यांनी यावेळी इशारा दिला.

Leave a Comment