उत्तर प्रदेशच्या ‘रेप कॅपिटल’मध्ये 11 महिन्यांत 90 बलात्कार


उन्नाव – उत्तर प्रदेशात योगी सरकारचे राज्य असताना तेथील कायदा सुरक्ष व्यवस्थेचे धिंधावडे निघाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कारण उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्हा हा ‘रेप कॅपिटल’ बनला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 11 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 90 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत,

त्यावरुन उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात योगी राज असताना कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचा अंदाज या घटनांवरून सहजपणे लावता येईल, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली असून उन्नावमध्ये तर स्थिती अधिकच गंभीर आहे. केवळ 2019 या वर्षात जिल्ह्यात झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या आकड्यांविषयी सांगायचे झाले तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या शतकाला फक्त 10-12 आकडे कमी आहेत. तर, महिलांसोबत नोव्हेंबर महिन्यापर्यंत झालेल्या छेडछाडीच्या तब्बल 185 घटना समोर आल्या आहेत.

राज्य सरकारवर काँग्रेसच्या अनेक बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊला आलेल्या प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला. त्याचबरोबर हे आकडे समोर ठेवून महिलांविरोधात संपूर्ण राज्यातच होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे त्या म्हणाल्या. प्रियांका यांनी महिलांना यावर उपाय म्हणून घराबाहेर पडा, निवडणूक लढवा आणि देशाची जबाबदारी स्वतःवर घ्या, असे आवाहन केले आहे. असे पाऊल उचलले तरच, महिला काहीतरी करू शकतील.

उन्नावची एक तरुणी 2019 मध्ये मुख्यमंत्री निवासावर पोहोचली आणि तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर या तरुणीने बलात्काराचा आरोप केला. सेंगरला विशेष न्यायालयाने दोषी ठरवत तिहार तुरुंगात त्याची रवानगी केली. ही पीडिता मागील 28 जुलैला सुनावणीसाठी रायबरेलीला निघाली होती. महिलेच्या चारचाकीला रस्त्यात ट्रकने जोरदार धडक दिली. तरुणीच्या काकू आणि मावशीचा या घटनेत मृत्य झाला. तर, तरुणीची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. या तरुणीच्या वडिलांचा 2017 मध्ये पोलिसांच्या कोठडीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे एकेक करून या तरुणीचे कुटुंबच संपले. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही सेंगर याला भाजप नेत्यांचे समर्थन मिळताना दिसत आहे.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर उन्नावमध्ये गुरुवारी आणखी एका तरुणीला जिवंत जाळल्याचे प्रकरण समोर आले. आरोपींनी सुनावणीसाठी न्यायालयात निघालेल्या बलात्कार पीडितेला जिवंत जाळले. यामध्ये पीडिता 90 टक्के भाजली होती. ती जळालेल्या अवस्थेतच मदत मागण्यासाठी एक किलोमीटर धावत गेली. रुग्णालयात तिला अत्यंत गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले. दिल्लीतील सफदरजंद रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

Leave a Comment