फडणवीसांच्या मर्जीतील 3 अधिकाऱ्यांच्या ठाकरे सरकारकडून बदल्या


मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या काळातील प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतल्यानंतर, या सरकारने आपला मोर्चा आता फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या ठाकरे सरकारने बदल्या केल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची बदली म्हणजे मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची बदली करण्यात आल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अधिकाऱ्यांच्या बदलीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालक पदावर अश्विनी जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर एस. एम. काकाणी यांची अश्विनी जोशींच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी सहआयुक्त सुमन चंद्रा यांची नेमणूक करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी या निकटवर्तीय मानल्या जातात. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा त्यांच्याविरोधात अविश्वास आणण्याचा प्रयत्न होता. शिवसेनेचा ‘आपली चिकीत्सा’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा दावा होता. शिवसेनेने या योजनेच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी लावून धरली होती. पण ठेकेदाराला एक संधी देण्याची भूमिका जोशी यांनी घेतली होती. वैद्यकीय आरोग्य, घनकचरा विभागाची जबाबदारी अश्विनी जोशी यांच्याकडे होती. अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती.

काल महापालिका मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समन्वय समित्यांची एकत्रित बैठक घेऊन अवघे 24 तास उलटत नाहीत, तोपर्यंत जोशी यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर महापालिकेत जोशी यांच्या पदावर एस. एम. काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अनेक प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आहेत. अश्विनी जोशी यांच्या तडकाफडकी बदलीतून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मालिका सुरु झाली आहे.

Leave a Comment