बीडीडी चाळीतील बाबासाहेबांच्या घराचे राष्ट्रीय स्मारक करणार – मुख्यमंत्री


मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले. यावेळी मुंबई पोलिसांकडून शासकीय सलामी देण्यात आली. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे काम प्रचंड असून ज्या ठिकाणाहून हे काम झाले ते बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करू, अशी घोषणा केली.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना बाबासाहेबांचे काम एका अग्निकुंडा प्रमाणे आहे. तळागाळातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा बाबासाहेबांनी अधिकार मिळवून दिला. लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर राष्ट्रीय स्मारक बनवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ज्या मुंबईमधील घरातून बाबासाहेबांचे काम झाले, ज्या घरात 22 वर्ष बाबासाहेब राहिले ते परळ डबक चाळीतील घर राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या घराला आपण भेट द्यायला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी देखील अभिवादन केले. ज्या प्रमाणे अडीच हजार वर्षांनंतरही भगवान बुद्धाचे नाव अजरामर झाले त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेबांचे नाव पुढच्या अडीच हजार वर्षांनंतरही घेतले जाईल. आज बाबासाहेबांमुळे देश एक आहे. गरीब आणि तळागाळातील लोकांना त्यांनी हक्क मिळवून दिला आहे. बाबासाहेबांच्या आदर्शावर चालून गरीब आणि तळागाळातील लोकांचा विकास होऊ शकतो, असे मत राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Comment