भाजपवर पुन्हा एकदा एकनाथ खडसेंचे टीकास्त्र


मुंबई – विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमताचा जनादेश दिला होता. शिवसेना- भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी समन्वय होऊन जर चर्चा झाली असती आणि भाजपने दोन पावले मागे घेऊन शिवसेनेला एक- दोन वर्षे मुख्यमंत्रिपद दिले असते तर महायुतीकडे राज्याची सत्ता कायम राहिली असती, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला. नाराजांची मोट बांधायची गरज नसते, तर ते आपोआपच एकत्र येतात, असे सूचक वक्तव्यही खडसेंनी यावेळी केले.

पक्षातील काही लोकच पंकजा व आपली कन्या रोहिणीच्या पराभवाला कारणीभूत असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. प्रदेशाध्यक्षांकडे या प्रकरणाची तक्रार करूनही काही उपयोग झाला नसल्याची नाराजीही खडसे यांनी व्यक्त केली होती. खडसे यांनी या पार्श्वभूमीवर बुधवारी पंकजा यांची भेट घेतली. विनोद तावडे यांनीही दोन दिवसांपूर्वी पंकजा यांची भेट घेतली होती, त्यापाठोपाठ बुधवारी त्यांनी खडसेंचीही भेट घेतली. खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझे गोपीनाथ मुंडे चांगले मित्र होते, त्यामुळे आमचे या कुटुंबाशी जुने नाते आहे. आजची भेट ही कौटुंबिकच होती. मी यापूर्वीच नेत्यांना पंकजा व रोहिणी यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाल्याचे नावानिशी कळवले आहे. आता कारवाईची प्रतीक्षा आहे. खालच्या माणसांना बोलण्यात अर्थ नाही. हे निर्णय ज्यांनी घेतले, त्यांनाच दोष द्यावा लागेल. जसे पक्षाचे नेते यशाचे भागीदार असतात, तसे अपयशाचेही व्हावे, असा टोलाही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लगावला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह कोअर कमिटीचे नेते शनिवारी मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर व मलकापूर येथील भाजपच्या पराभवाची कारणीमिमांसा तपासण्यासाठी जळगावात येणार आहेत. खडसेंच्या उपस्थितीत त्यांची बैठक होणार आहे.

Leave a Comment