राज्यसभेत मंजूर झाले सुरक्षा सुधारणा विधेयक


नवी दिल्ली : राज्यसभेत आज सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक) मंजूर करण्यात आले आहे. काँग्रेसने या विधेयकाचा विरोध करत सभात्याग केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडले. सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी) काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. काँग्रेसने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हे विधेयक मंजूर झाल्याने यापुढे केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. आता माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही, हे या नव्या विधेयकामुळे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, मोदी सरकारवर गांधी घराण्याची सुरक्षा हटविल्यानंतर जोरदार टीका झाली. याआधी सुरक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. आज ते राज्यसभेतही मांडण्यात आले. या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी गांधी घराण्यावर टीका केली. केवळ एका कुटुंबाच्या हितासाठी हे विधेयक आणण्यात आले नसल्याचे शहा म्हणाले. काँग्रेसच्या वत्तीने गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षा का हटवण्यात आली, असा सवाल करण्यात आला होता. यावर उत्तर देताना शहा म्हणाले, गांधी कुटुंबीयांची सुरक्षा हटवण्यात आलेली नाही, तर ती बदलण्यात आली आहे.

माजी पंतप्रधानांचे एसपीजी कव्हर देखील मागे घेण्यात आले आहे. नरसिंह राव, चंद्रशेकर, आय.के. गुजराल, मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांची सुरक्षा काढण्यात आली आहे. लोकशाहीमध्ये कायदा प्रत्येकासाठी समान असतो, एखादे कुटुंब नाही, केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

Leave a Comment