पक्षांतर्गत कारवायांमुळेच पंकजा-रोहिणी यांचा पराभव – एकनाथ खडसे


जळगाव – भाजपमधील काही जणांनी केलेल्या पक्षांतर्गत कारवाया पंकजा मुंडेंसह रोहिणी खडसे यांच्या पराभवाला कारणीभूत असून त्यांच्या पराभवासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले आहेत. पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई न झाल्यामुळे पंकजाच नाही, तर भाजपमधील अनेकजण नाराज असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्याकडून वारंवार भाजपवर हल्लाबोल सुरू आहे. त्यांनी सोमवारी जळगावात आपल्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. पंकजा मुंडे आणि त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेबाबत यावेळी पत्रकारांनी विचारणा केली असता हा गौप्यस्फोट त्यांनी केला. खडसे पुढे म्हणाले, पंकजा मुंडेंसह अनेकजण भाजपमध्ये नाराज आहेत. पक्षांतर्गत कारवाया करून हेतूपुरस्सरपणे पंकजा मुंडे तसेच रोहिणी खडसे यांना पाडण्यात आले आहे. हे कारस्थान ज्यांनी केले; पक्षाच्या वरिष्ठांकडे त्यांच्याबाबत तक्रारी केल्या आहेत. संबंधितांवर कारवाईची मागणी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे पक्षात अस्वस्थता असल्याचे खडसेंनी सांगितले.

पंकजा मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पण पक्षश्रेष्ठींनी पराभूत उमेदवारांशी साधी चर्चाही न केल्यामुळे अनेकजण नाराज आहेत. पराभूत उमेदवारांशी पक्षश्रेष्ठींनी चर्चा करून पराभवाची कारणे शोधायला हवी होती. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंतही खडसेंनी यावेळी व्यक्त केली. पंकजा मुंडे काय निर्णय घेणार? हे आपल्याला माहित नसल्यामुळे १२ डिसेंबरपर्यंत सर्वांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. जर पंकजा मुंडे यांनी मला बोलावले तर आपण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर निश्चित जाऊ, असेही खडसे यांनी शेवटी सांगितले.

Leave a Comment