फडणवीसांच्या त्या नाटकाचा भाजप नेत्याकडून गौप्यस्फोट


नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीच्या सरकारकडून गैरवापर होऊ नये यासाठी बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. शनिवारी कर्नाटकातील एका कार्यक्रमात बोलताना हा दावा त्यांनी केला असून यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दरम्यान वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार हेगडे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा निधी पडून होता. दरम्यान, जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील, हे फडणवीस यांना चांगलेच माहित होते. त्यामुळेच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचे नाटक हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी करण्याचे ठरले. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले.

तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रात ८० तासांसाठी आमचा माणूस मुख्यमंत्री बनला होता. फडणवीसांनी त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हे नाटक त्यांनी कशासाठी केले? ते बहुमत नसतानाही मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. हे त्याचे उत्तर असल्याचेही हेगडे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment