नवी दिल्ली : 1 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून काही गोष्टी बदलणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये एलआयसी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मोबाइलचे दर या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.
तुम्हाला जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आधार कार्ड लिंक करावे लागणार होते. पण त्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. आधार कार्ड शेतकऱ्यांसाठी असलेला 6 हजार रुपयांचा निधी मिळवण्यासाठी हे लिंक करणे महत्त्वाचं आहे. असे असले तरी यासाठी 31 मार्च 2020 पर्यंतची मुदत काश्मीर, लडाख, आसाम, मेघालय या राज्यांत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
उद्यापासून मोबाइलचे दर वाढणार आहेत. त्याचबरोबर इंटरनेटचा वारपरही महाग होणार आहे. टेलिकॉम कंपन्या टेरिफ प्लॅन वाढवण्याच्या तयारीत आहे. टेलिकॉम क्षेत्रावर कर्जाचा बोजा असल्यामुळे मोबाईलचे दर वाढणार आहेत.
उद्यापासून लाइफ इन्शुरन्स म्हणजेच विम्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. विमा पॉलिसी जर तुम्ही घेणार असाल तर नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता थोडा महाग होऊ शकतो. पण हप्ता महाग झाला तरी ग्राहकांना चांगला फायदा मिळेल. त्यामुळे तुम्ही नवी पॉलिसी घेणार असाल तर थोडी वाट पाहा.
1 डिसेंबर 2019 पासून आपले प्लॅन्स आणि प्रपोझल फॉर्ममध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बदल करणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू झाल्यानंतर एलआयसीचे नवे प्लॅन्स आणि प्रपोझल फॉर्म आणखी सर्वंकष होणार आहेत.