पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री पामेला एंडरसनने पत्र लिहिले आहे. सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीयांना शाकाहारी अन्नाचे सेवन करण्यास प्रोत्साहित करण्याची यात तिने विनंती केली आहे. ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ या संस्थेच्यावतीने पामेलाने हे पत्र लिहिले आहे. भारतातील वाढत्या प्रदूषणाबाबत या पत्रात पामेलाने चिंता व्यक्त केली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पामेला नेहमीच चर्चेत असते. पामेलाने यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाहन केल्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे.
Letter to India PM Narendra Modi https://t.co/hElLXiC4ib #India
— Pamela Anderson (@pamfoundation) November 29, 2019
पामेलाने या पत्रात म्हटले आहे की, भारत हा कृषीप्रधान देश असून देखील भारतातील लोक शाकाहाराच्या तुलनेत मांसाहार अधिक करतात. देशातील प्रदूषण कमी करायचे असेल तर, शाकाहाराला प्रोत्साहन द्यायला हवे. वायू प्रदुषण होण्याचा धोका मांसाहारी कचऱ्यामुळे वाढतो. तसेच घरे, कारखाने, वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे उत्सर्जन कमीत-कमी असले पाहिजे.
त्याचबरोबर तिने आपल्या पत्रात प्लॉस्टिक कचऱ्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी कागदाच्या पिशव्यांचा वापर वाढवण्यावर भर द्यायला हवा. तसेच रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत, पॉलिएस्टर ऐवजी सुती कपड्यांचा वापर करणे आवश्यक आहे. प्रदूषण करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करावी. तसेच प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर योग्य कारवाई करण्यात आली पाहिजे, असेही म्हटले आहे.