उद्धव ठाकरेंनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवरायांना वंदन करून मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी यावेळी मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली. मंत्रालय नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने सज्ज होते. मंत्रालयातील पोलिसांची सुरक्षाची नेहमीपेक्षा वाढवण्यात आली आहे. सहाव्या मजल्यावर जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबत यावेळी आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मदतीबाबत अहवाल मागवला असून ते त्याबाबतही आज आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९वे मुख्यमंत्री असून राज्याच्या इतिहासात ठाकरे परिवारातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री झाला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर शिवसेना-राष्ट्रवादी -काँग्रेसच्या महाष्ट्र विकासआघाडीने सरकार स्थापल केले. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. उद्धव यांनी भगवा सदरा परिधान केला होता. मातोश्रीवरुन ते बाहेर पडल्यानंतर थेत हुतात्मा चौकात जावून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्यांना आदरांजली वाहल्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या दिशेन कूच केली. त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र विकासआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंत्रीही उपस्थित होते. शिवसैनिकांचा मोठा उत्साह ओसंडून वाहत होता.

दरम्यान उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची ओएसडी म्हणजे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नावाची पाटी बदलण्यात आली असून पाटीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे असे संपूर्ण नाव लिहिण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात येण्यापूर्वीच ही सर्व तयारी करण्यात आली आहे. कार्यालयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली आहे.

Leave a Comment