साध्वी प्रज्ञा यांचा त्या वक्तव्यावरुन लोकसभेत माफीनामा


नवी दिल्ली – ‘डीएमके’चे खासदार ए. राजा यांनी ‘विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान महात्मा गांधी यांच्या हत्येचे उदाहरण दिले. गोडसे याने विशेष सुरक्षेअभावी कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली, हे राजा यांनी सभागृहात सांगितले. पण त्यांना रोखत भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये, असे बजावले. सभागृहात यानंतर गोंधळ झाला होता. त्याचबरोबर भाजपसह विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेधही केला होता. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याबाबत अखेर शुक्रवारी लोकसभेत माफी मागितली.

महात्मा गांधी यांचा मी सन्मान करते. त्याचबरोबर त्यांच्या योगदानाचाही मी सन्मान करते, असे म्हणत साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. त्याचबरोबर न्यायालयात कोणताही गुन्हा आपल्यावर अद्याप सिद्ध झाला नाही. तरी मला दहशतवादी म्हटले जाते. हा एका स्त्रीचा अपमान आहे आणि हा एकप्रकारचा अपराध असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार लोकसभेत करणे चांगलेच महागात पडले होते. ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत विरोधकांनी बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर भाजपने कारवाई केली होती. प्रज्ञा ठाकूर यांची वादग्रस्त विधानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य दुर्देवी असून संसदेत असे वक्तव्य करणे निंदनीय आहे, असे मत नोंदवले होते. प्रज्ञा ठाकूर यांना समितीतून केलेल्या हकालपट्टीमुळे समितीच्या कोणत्याच बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. ही समिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आली. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. विरोधी पक्षातील खासदारांपैकी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.

Leave a Comment