मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली हे सर्वश्रृत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राऊत यांनी रोज सकाळी पत्रकार परिषद घेणे बंद केले असले तरी ट्विटरच्या माध्यमातून शेर पोस्ट करण्याची मालिका मात्र सुरुच ठेवली आहे. त्यातच आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आता गोव्यात राजकीय भुकंप घडवणार असल्याचे म्हणत भाजपला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबर गोव्यातील विजय सरदेसाई यांच्यासह 4 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. तसेच गोव्यात शिवसेना नवी राजकीय आघाडी बनवणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं
कि बस पैदल ही राजा को मात करते हैं— Sanjay Raut (@rautsanjay61) November 29, 2019
दरम्यान संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळी ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला आहे. “हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं, कि बस पैदल ही राजा को मात करते हैं” हा शेर संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.