विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी हेळसांड : एक लिटर दुधात एक बादली पाणी


सोनभद्र – अनेक राज्य सरकारांकडून सध्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनाची सुविधा देण्यात येते. पण यामध्ये अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचेही समोर येत आहे. तत्पुर्वी उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधील मध्यान्ह भोजनाची घटना समोर आल्यानंतर आता तशीच एक घटना मध्य प्रदेशातील सोनभद्र येथे घडली आहे. या ठिकाणी एक लिटर दुधात चक्क एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

बुधवारी ग्रामपंचायतीच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दुध देण्यात आले. पण ८१ विद्यार्थ्यांना एक लिटर दुध वाटून देण्यासाठी त्यामध्ये चक्क एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्याचबरोबर या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांनीही तपास करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार खाण्यासोबत १५० मिलीलिटर दुध देण्यात येणार होते. १७१ विद्यार्थी ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. यापैकी ८१ विद्यार्थी बुधवारी उपस्थित होते. परंतु या ८१ विद्यार्थ्यांसाठी केवळ १ लिटर दुध पाठवण्यात आले. १ ग्लास प्रत्येक विद्यार्थ्यांना दुध मिळावे यासाठी त्यामध्ये चक्क १ बादली पाणी मिसळण्यात आले.

दरम्यान, ग्रामपंचायतीचे वॉर्ड क्रमांक ७ चे सदस्य देव कालिया यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर कायम अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला. काहीही न बोलता आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी असे पाणी मिश्रीत दुध पितात. अधिकाऱ्यांकडे याबाबत अनेकदा तक्रार केली, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. शाळेचे प्रभारी शैलेश कनोजिया यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आपल्याकडे दोन्ही शाळांचा प्रभार असल्यामुळे वेळेत दुध उपलब्ध होऊ शकले नसल्याचे म्हटले. त्यानंतर आम्ही दुधाची व्यवस्था केली परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा दुध देण्यास मनाई केली. तसेच दुसऱ्या दिवशी ते दुध विद्यार्थ्यांना देण्याच्या सुचना केल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment