शिवसैनिकाच्या जागी स्वतःच पालखीत बसले शिवसेना पक्षप्रमुख


नागपूर – उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच बसवेन, असे वचन दिले होते. पालखीचे भोई शिवसैनिक होणार नाहीत, तर पालखीत तेच बसतील, असेही ते म्हणत होते. पण, आता त्या पालखीत शिवसैनिकाला न बसवता पालखीत स्वतः पक्षप्रमुखच बसायला निघाले, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्यामुळेच दोघांची युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत जात महाविकासआघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे स्वतः आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. पण, पालखीत बसणाऱ्या भोयांना त्यांचे ओझे पेलणार आहे का? असाही खोचक सवाल करण्यात आला. एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून शिवसेनेने निवड केली होती. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करायला पाहिजे होते. पण, शिवसेनेला जाळ्यात फसवणाऱ्या अजित पवारांच्या काकांनी त्याला नकार दिल्याचे म्हणत शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने थोडी घाई केली. पण, भाजपचे त्यामुळे फार मोठे नुकसान झाले नसल्य़ाचे म्हणत भाजपवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. तसेच अभद्र महाआघाडीचे सरकारमधील पोकळपणा लवकरच जनतेसमोर येणार असल्याचाही उल्लेख या अग्रलेखात करण्यात आला आहे.

Leave a Comment