मावळत्या मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर आवरा-आवर सुरु


मुंबई : आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देशभरातील विविध पक्षातील नेत्यांना या शपथविधीसाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. एकीकडे ही लगबग सुरु असताना, तिकडे मावळत्या मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर आवरा आवर सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरगुती साहित्य घेऊन जाण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी टेम्पो आला आहे. त्याचबरोबर जवळपास 12 लोक साहित्य पॅक करण्यासाठी आले आहेत.

12 नोव्हेंबरला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. त्यामुळे मंत्र्यांना आपले बंगले रिकामे करावे लागले होते. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम आणखी तीन महिने वर्षा बंगल्यातच राहील असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांना बंगला खाली करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. पण 23 नोव्हेंबरला रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि राज्यातील सत्तासमीकरणे बदलली.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने भूकंप झाला. पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. पण त्यापूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळले.

आता मुख्यमंत्रिपदाची उद्धव ठाकरे हे शपथ घेत असल्याने, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळख असलेला वर्षा बंगला आता त्यांना मिळणार असल्यामुळे मावळत्या मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला खाली करावा लागत आहे. सोशल मीडियावरही गेल्या काही दिवसापासून वर्षा बंगला सोडण्याबाबतचे मीम्स व्हायरल होत होते. अखेर आता देवेंद्र फडणवीसांना आवराआवर सुरु केली आहे.

Leave a Comment