
मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मला भाजपमध्ये असल्याचा अभिमान आहे, कारण भाजपने सत्तेसाठी कोणाचेही तळवे चाटले नाही की कोणाची लाचारी पत्करली असे, म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर मातोश्रीवर बसून रिमोट कंट्रोल चालवणे सोपे असते पण वास्तविक काम करणे कठीण असल्याचेही नितेश राणे यांनी यावेळी म्हटले आहे.
सत्तेसाठी आम्ही कोणाची लाचारी नाही पत्करली
मी ज्या भाजप पक्षाच्या माध्यमातून आमदारकीची शपथ घेतली त्या पक्षाचा मला अभिमान आहे. कारण भाजपने सत्तेसाठी कोणाची लाचारी केली नाही. फडणवीस यांनी समर्थन नव्हते तेव्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. पंचतारांकित हॉटेलांची आम्हाला गरज लागली नाही. कोणाचेच तळवे चाटले नाहीत किंवा कोणाची लाचारी पत्करली नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. यावेळी आदित्य ठाकरेंना नितेश राणे यांनी शुभेच्छाही दिल्या.
नितेश राणे यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंबंधी प्रश्न विचारले ते म्हणाले की, मातोश्रीवर बसून आदेश सोपे असते. पण विधीमंडळात प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. मैदानात आमच्यासारखी लोक तयार आहेत. महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊन हे आम्ही हक्काने सांगतो. आम्हाला विधीमंडळात महाराष्ट्राच्या हक्कासाठी, न्याय मिळवण्यासाठी पाठवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
