आरोग्यासाठी फळांचे सेवन लाभदायक असल्याने बहुतेक घरांमध्ये फळे आणली जातात. पण काही वेळा कापलेली फळे उरतात आणि ती काळी पडतात. काही वेळा खूप प्रकारची फळे कापून घेतली जातात; पण खाल्ली जात नाहीत. त्यामुळे ती काळी पडून वाया जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी कापलेली फळे चांगली कशी ठेवता येतील, हे जाणून घ्या
लिंबाचा रस – लिंबाचा रसामुळे फळे काळी पडत नाहीत. एका लिंबाच्या रसाने दीड वाटी फळांच्या फोडी ताज्या ठेवता येतात. लिंबू कापून त्याचा रस काढून सगळ्या फळांना लावायचा आहे. फळांना लिंबाचा रस लावल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका.
प्लास्टिक रॅप – प्लास्टिक रॅपमुळे फळे तीन-चार तास चांगली राहू शकतात. लिंबाचा रस लावायचा नसेल तर ही कल्पनाही वापरू शकता. फळांचे तुकडे ठेवलेली वाटी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा अल्युमिनिअम फॉइल लावून ठेवता येतील. त्याला छोटी छोटी भोके पाडावी लागतील. फळे झाकून फ्रीजमध्ये ठेवल्याने फळांचा वास फ्रीजला लागत नाही किंवा इतर कोणताही वास फळांना लागत नाही.
सायट्रिक ऍसिड – सायट्रिक ऍसिडची पावडर वापरल्याने फळे 10-12 तास ताजी राहू शकतात. सायट्रिक ऍसिड पावडरच्या रूपात बाजारात हमखास उपलब्ध असते. ही पावडर वापरल्याने फळांची चवही जशीच्या तशी राहते.
थंड पाणी – कापलेली फळे एका डब्यात घालून तो डबा बर्फ घातलेल्या पाण्यात ठेवावा. त्यामुळे कापलेली फळे 3-4 तास ताजी राहतात.