बांगलादेश क्रिकेट बोर्डाला हवे आहेत धोनीसह हे ७ भारतीय खेळाडू


नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून लांब आहे. त्याचे चाहते त्याला परत मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण पुनरागमनाविषयी धोनीने अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, आता धोनी टीम इंडियाकडून नाही तर आशियाई इलेव्हन संघाकडून खेळताना दिसू शकतो.

विश्व इलेव्हन आणि आशियाई इलेव्हन यांच्यात पुढील वर्षी १८ मार्च ते २१ मार्च २०२० दरम्यान, २ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या सामन्यांसाठी बीसीसीआयकडे धोनीसह ७ भारतीय खेळाडूंची मागणी केली आहे. या यादीत महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दीक पांड्या, रोहीत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.

बीसीसीआयला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एक प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये धोनीसह सात खेळाडूंच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निजामुद्दीन चौधरी यांनी या विषयी सांगितले की, बांगलादेशमध्ये आशियाई इलेव्हन आणि विश्व इलेव्हन यांच्यात २ टी-२० सामने होणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयने सात खेळाडूंना या सामन्यांसाठी परवानगी द्यावी. या प्रस्तावाला बीसीसीआयने जर मान्यता दिली तर, या दोन सामन्यात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. दरम्यान, बांगलादेश बीसीसीआयबरोबरच इतर बोर्डकडेही खेळाडूंसाठी मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे.

Leave a Comment