महाराष्ट्रात काळ्या शाईने नोंदवले जाईल आजचे कांड – काँग्रेस


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे केंद्रातील नेते उपस्थित होते. यावेळी भाजपवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सडकून टीका केली.

आज सकाळी सकाळी बँड, बाजा, बारात यांच्याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली हे तर तुम्हाला माहिती आहे. पण या कांडाची नोंद महाराष्ट्रात काळ्या शाईने नोंदवली जाईल, असे अहमद पटेल म्हणाले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले, पण काँग्रेसला दिले नाही. त्यांनी ज्याप्रकारे खातरजमा न करता त्यांनी एका नेत्याने दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे शपथ दिली. यातून चुकीचे झाले असल्याचे स्पष्ट आहे.

हा प्रकार संविधानाला पायदळी तोडण्याचा प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करतो. ज्या प्रक्रियेद्वारे व्हायला हवे होते, ते होणे अपेक्षित होते. आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करुन देखील निश्चित केले. आम्ही काल बैठक घेतली, त्यात दोन तीन मुद्दे बाकी होते, आम्ही आज सकाळी त्यासाठी भेटून चर्चा करणार होतो. पण, त्याआधीच हे कांड झाले. त्याचा जितका निषेध करावा तो कमी आहे.

ज्या ज्या तारखा शरद पवार यांनी दिल्या आम्ही त्या त्या तारखेला उपस्थित होतो आणि बैठकांमध्ये सहभागी झालो. काँग्रेसने अजिबात उशीर केला नाही. आज जे झाले ते राष्ट्रवादीतून काही लोक फुटल्याने झाले. बहुमत चाचणीत भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांना आम्ही पराभूत करु, असे अहमद पटेल म्हणाले.

जे आम्ही सकाळपासून बोललो त्याप्रमाणे सायंकाळच्या बैठकीत संबंधित नेत्यांवर कारवाईचा किंवा दुसरा नेता ठरवण्याचा निर्णय होईल. आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. केवळ दोन गावाकडे आहेत. सर्व आमदार एकजूट असून भाजपला पराभूत करण्यासाठी तयार आहेत. आम्ही भाजपला राजकीय आणि कायदेशीर दोन्ही मार्गांनी उत्तर देऊ. दोन्ही आघाड्यांवर आम्ही काम करु, असेही अहमद पटेल यांनी ठणकावले.

जी मूल्ये संविधानाची आहेत त्यावर आम्हाला सहमती घ्यायची होती. शिवसेनेने त्यावर सहमती दिल्यामुळे आता आम्ही सोबत आहोत, वेगळे असण्याचा कोणताही प्रश्न शिल्लक नाही. संजय निरुपम व्यक्ती म्हणून काही मत व्यक्त करत असतील तर त्यावर मी बोलणार नाही. शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय आम्ही पक्ष म्हणून घेतला आहे. जर काँग्रेसला जर कारवाई करण्याची आवश्यकता वाटली तर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असे अहमद पटेल म्हणाले.

Leave a Comment