शपथविधीनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते ‘नॉट रिचेबल’


मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज सकाळी राजभवन येथे शपथ घेतली. संपूर्ण राज्याला अचानक झालेल्या शपथविधीने मोठा धक्का बसला असून यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच बडे नेते नॉट रिचेबल झाले आहेत. अनेक नेत्यांनी आपले फोन बंद करून ठेवले असून नेमका शपथविधी राष्ट्रवादीच्या संमतीने झाला की, अजित पवार यांनी हा निर्णय घेतला याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला असल्यामुळे या संदर्भातील नेमके चित्र येत्या काही वेळात स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर ही राज्यात असे काही नवीन समीकरण तयार होईल, अशी कुणकुण कोणालाही लागली नव्हती. पण, आज सकाळी झालेल्या शपथविधीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे 2 आमदार अजित पवार यांच्यासोबत होते. त्यात अहमदपूर येथील बाळासाहेब जाधव आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे दोघेच उपस्थित होते.

यासंदर्भात सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते या सर्वच नेत्यांचे फोन बंद आहेत. राष्ट्रवादीकडून या संदर्भातील कोणती माहिती देण्यास नकार देण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने आमच्यासोबत घात केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात राष्ट्रवादीच्या निर्णयाला विश्वासघात केला, असल्याची प्रतिक्रिया दिली. आपल्या मित्रपक्षांना अशा प्रकारे गाफील ठेवून दगा देणे चुकीचे असून काँग्रेस लवकरच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment