अग्रलेखांचा बादशहा काळाच्या पडद्याआड


मुंबई – आज पहाटे अल्पशा आजाराने दैनिक नवाकाळचे ज्येष्ठ संपादक, लेखक नीळकंठ यशवंत खाडिलकर यांचे निधन झाले. चंदनवाडी स्मशानभूमी, मरीन लाईन्स स्थानकासमोर त्यांचा अंत्यसंस्कार विधी दुपारी 3 वाजता केला जाणार आहे. तसेच नवाकाळ कार्यालय खाडिलकर रोड गिरगाव येथे दुपारी १२ ते २ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

गेली ६ दशके सातत्याने आपल्या तेज लेखणीने अन्यायाविरोधात अग्रलेखांच्या माध्यमातून वाचा फोडणारे नीळकंठ खाडिलकर काळाच्या पडद्या आड गेले आहेत. खाडिलकरांनी अग्रलेख, प्रॅक्टिकल समाजवाद आणि आपल्या भारधार वक्तृत्वाने नवाकाळची कीर्ती साता समुद्रापार पोहोचवली. तसेच सामान्य जनतेचा तोफखाना अशी खाडिलकरांची ओळख होती.

६ एप्रिल १९३४ रोजी नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म झाला. नवाकाळचे नीळकंठ खाडिलकर अनेक वर्षे संपादक होते. त्यांनी या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर अग्रलेखांमधून भाष्य केले. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. तसेच त्यांनी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून खाडिलकर यांनी जवळपास २७ वर्षे काम केले. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. ते ‘दैनिक संध्याकाळ’ या नावाचे सायंदैनिकही काढत असत. खाडिलकरांचे ‘हिंदुत्व’ हे पुस्तक समीक्षकांच्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरले. आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत नीळकंठ खाडिलकर यांनी वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.

Leave a Comment