संभाजी ब्रिगेडने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृष्यांवर तसेच संवादांवर आक्षेप नोंदवला असतानाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आता या वादात उडी घेतली असल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात हा चित्रपट अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक ओम राऊत यांना उद्देशून जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. वेळीच ट्रेलरमधील वादग्रस्त दृष्य व संवाद वगळा अन्यथा परिणामांना सामोरे जा, हे केवळ ट्विट नसून थेट धमकीच समजा, असा इशारा दिल्याने आव्हाड फारच संतापले असल्याचे या ट्विटवरून दिसत आहेत.
ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.
याला धमकी समजली तरी चालेल.#TanhajiTrailer @omraut— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 20, 2019
आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी, ओम राऊत तुमच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर याला धमकी समजली तरी चालेल, असेही म्हटले आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड या संघटनेने ट्रेलरबाबत आपला आक्षेप नोंदवला होता. छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण आहे, अभिनेञी काजोलच्या तोंडी असलेले संवाद आणि महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर दाखवण्यात आलेल्या ॐ वर ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.
संभाजी ब्रिगेडने या सर्व गोष्टींबाबत निर्माता अजय देवगन व दिग्दर्शक ओम राऊत यांनी खुलासा करावा अशी मागणीही केली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या वेळी मंगळवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणने या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली असल्याचे स्पष्ट केले होते. आम्ही चित्रपटातील सर्व संदर्भ ऐतिहासिक असून यावर बराच अभ्यास केला आहे. कोणाच्याही भावना दुखवाल्या जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना अजय देवगणने स्पष्ट केले होते.