शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नामकरण, ‘महाविकासआघाडी’


मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्तरित्या राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारचे नाव ‘महाशिवआघाडी’ नव्हे तर ‘महाविकासआघाडी’ असेल अशी माहिती समोर आली आहे. जेव्हापासून हे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हापासून महाशिवआघाडी सरकार असे नाव त्याला देण्यात आले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हे नाव मंजूर नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. फक्त शिवसेनेचे नाव महाशिवआघाडी या नावात असल्याने आघाडीच्या कालच्या संयुक्त बैठकीत त्याला आक्षेप घेतल्याच्या चर्चा सुरु असल्यामुळे आता हे नाव बदलून महाविकासआघाडी असे करण्यात येणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामधील महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि सरकार स्थापनेच्या जवळ पाऊल टाकले आहे. वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या या तिन्ही पक्षांची किमान समान कार्यक्रमावर सहमती काँग्रेस आपल्या विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही, हे आघाडीच्या बैठकीत ठरले आहे. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा बैठकीत तयार करण्यात आला आहे. ना शिवसेना ना काँग्रेस-राष्ट्रवादी वादग्रस्त मुद्दे उपस्थित करणार यावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

परंतु जी आघाडी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह छोट्या पक्षांची बनेल त्याचे नाव महाशिवआघाडी नसेल. तर या सरकारचे नाव महाराष्ट्र विकास आघाडी असेल. समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमान शेतकरी संघटनेसह मित्रपश्रांचा यामध्ये समावेश असेल. सूत्रांच्या माहितीनुसार पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, एक काँग्रेसचा आणि दुसरा राष्ट्रवादीचा. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती, परंतु बहुतांश नेते यासाठी राजी झाले नाही. काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोनिया गांधींवर सोपवण्यात आला आहे.

सरकार स्थापनेसाठी बैठकांचा सिलसिला सुरु आहे. आज सकाळी 9 वाजता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर 11 वाजता काँग्रेस कोअर ग्रुपच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीत अंतिम मसुदा तयार होईल. उद्या मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये हा मसुदा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत ठेवला जाईल. शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची माहिती दिली जाईल. जर शिवसेना राजी झाली तर खातेवाटपावर बातचीत होईल. सगळे व्यवस्थित पार पडलं तर शनिवारी राज्यपालांना भेटून तिन्ही पक्षांचे नेते सरकार स्थापन करण्याचा दावा करतील.

Leave a Comment