नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजेच महाविकासआघाडीचे सरकार येणार, हे आता जवळजवळ निश्चित झाले असल्यामुळे नेमका कुणाचा या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळात समावेश असेल, याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काही वेळापूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेऊन दाखल झाले होते. त्यानंतर काँग्रेसनेही आता आपली यादी तयार केल्याची माहिती मिळाली आहे.
या संदर्भातील वृत्त ‘न्यूज18 लोकमत’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी संभाव्य मंत्रिमंडळातही अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर धुरा देण्याचे ठरवलेले दिसत आहे. नव्या मंत्रिमंडळात आघाडी सरकारमध्ये सामील असलेले अनेक जुने नेते देखील पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.
अशी आहे राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे
- जयंत पाटील
- नवाब मलिक
- हसन मुश्रीफ
- अनिल देशमुख
- धनंजय मुंडे
- छगन भुजबळ
- अजित पवार
- दिलीप वळसे पाटील
- मकरंद पाटील
- राजेश टोपे
अशी आहे काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे
- अशोक चव्हाण
- पृथ्वीराज चव्हाण
- बाळासाहेब थोरात
- विजय वडेट्टीवार
- के सी पाडवी
- विश्वजीत कदम
- यशोमती ठाकूर
- सतेज बंटी पाटील
- सुनिल केदार
राष्ट्रवादीसह काँग्रेसचेही एकूण 15 मंत्री नव्या सरकारमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आणखी काही नावांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नसल्यामुळेच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याची चर्चा होती. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही भाष्य केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.