काँग्रेस नेत्यांचे शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार


मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचे शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठीचे सत्र अद्यापही सुरु आहे. काँग्रेस कार्यकारिणीची नवी दिल्लीत सकाळपासून बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. काँग्रेसची बैठक अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत सुरु आहे. दरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले असून शिवसेनेकडे पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद असावे अशी चर्चा असल्याची माहिती दिली आहे. ५०-५० फॉर्म्युलावर बैठकीत चर्चा सुरु असून कोणाकडे किती कालावधी असावा यावर चर्चा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीने हिरवा कंदील दिला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

बिगरभाजप सरकार राज्यात स्थापन करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील सत्तापेच सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचा उल्लेख केला. पण, त्यांनी शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले. शिवसेनेशी हातमिळवणी करणार का, या मुद्दय़ावर काँग्रेसने अजून तरी अधिकृतपणे कोणतेही भाष्ट केलेलं नाही. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पर्यायी सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपूर्वी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेनेशी हातमिळवणी, सरकारमधील सहभाग आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अहमद पटेल, वेणुगोपाळ, जयराम रमेश आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे केंद्रीय नेते उपस्थित होते. एकूणच राजधानी दिल्लीत दिवसभर चर्चाचा सपाटा सुरू होता, पण त्यातून निष्पन्न काय झाले हे स्पष्ट झाले नव्हते.

Leave a Comment