ऐतिहासिक कसोटी सामन्यात पंचांची होणार परीक्षा


कोलकाता : ऐतिहासिक डे/नाइट कसोटी सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार असून चेंडू अंधार पडल्यानंतर पाहणे फक्त फलंदाजांसाठीच नव्हे तर पंचांसाठीदेखील अडचणीचे आणि आव्हानात्मक ठरणार असल्याचे निवृत्ती घेतलेले ऑस्ट्रेलियाचे पंच सायमन टफेल यांनी सांगितले आहे. तसेच चेंडूचा रंग नवा असल्यामुळे सरावा दरम्यान पंचांनी देखील सहभाग घेण्याची गरज आहे. सायमन टफेल अॅडलेडवर पहिल्यांदा खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, पंच चेंडू स्पष्ट पाहण्यासाठी कृत्रिम लेन्स वापरू शकतात.

सायमन टफेल यांनी सांगितले की, चेंडूला वेगळ्या पद्धतीने पाहण्यासाठी कोणत्या प्रकारच्या लेन्सचा वापर करतील किंवा नाही हे मला माहिती नाही. त्या पंचांवर हे अवलंबून आहे. पण जितके शक्य होईल तितका त्यांना नेट सरावा दरम्यान भाग घ्यायला हवा. अंधार पडल्यानंतर प्रकाशात बदल होईल आणि सुर्यप्रकाशाऐवजी लाइट लावल्या जातील. तेव्हा चेंडू दिसण्यात फलंदाजासमोर मोठे आव्हान असणार आहे. मला वाटते की हे पंचांसाठीदेखील आव्हान असल्याचे सायमन टफेल म्हणाले.

आपले पुस्तक फाइंडिंग द गॅप्स या पुस्तकाच्या प्रमोशननिमित्त टफेल हे भारतात आले आहेत. ते कोलकात्यातील ऐतिहासिक कसोटीवेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. टफेल यांनी यावेळी बांगलादेशच्या खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गुलाबी चेंडूने खेळण्याचा त्यांना अनुभव नाही. त्याउलट भारताचे अनेक क्रिकेटपटू घराच्या मैदानावर गुलाबी चेंडूने खेळले आहेत. बांगलादेशने एकमेव डे/नाइट सामना 2013 मध्ये खेळला होता. तेव्हाच्या संघातील एकही खेळाडू सध्याच्या संघात नाही.

Leave a Comment