सावरकरांच्या ‘भारतरत्न’ला कायमच विरोध


नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणे म्हणजे महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या करणे आहे, अशी प्रतिक्रिया दिली. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. कालच्या पत्रकार परिषदेत या मागणीचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुनरुच्चार केला. ही मागणी भाजपच्याही अनेक नेत्यांची आहे. भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यातही सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख करण्यात आला होता.

पण काँग्रेसचा भाजप-शिवसेनेच्या या मागणीवर आक्षेप आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी म्हणजे गांधीजींच्या विचारांची हत्या असल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे. हुसेन दलवाई म्हणाले, सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी आमचा कायम विरोध असेल. माझा विरोधही वेळ पडल्यास सभागृहामध्ये दर्शवेन. त्यांना भारतरत्न देणे म्हणजे गांधीजींच्या विचारांची हत्या करण्यासारखेच आहे. अनेक राजकीय नेत्यांनी सावरकरांविषयींची आपली भूमिका त्यांच्याविरोधात मांडली असताना, सरकार मात्र त्यांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न करत आहे, हे सरकार सावरकर विचारांचे सरकार असल्याचेही हुसेन दलवई म्हणाले.

एकीकडे सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:ही अनेकवेळा केली आहे. असे असताना महाराष्ट्रात आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे. नेहमीच हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी घेऊन शिवसेना राजकारण करत आली आहे.पण सेनेचा हा मुद्दा आता काँग्रेस-राष्ट्रवादीला किती रुचतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment