कोल्हापूराच्या महापौरपदी महाशिवआघाडीचा महापौर विराजमान


कोल्हापूर : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून राज्याला नवा सरकार कधी मिळणार हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात अद्याप कायम असताना, कोल्हापुरात महाशिवआघाडीने पहिला विजय मिळवला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड सूरमंजिरी लाटकर यांची कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली आहे. गेल्या चार वर्षापासून येथे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी आहे.

दरम्यान सूरमंजिरी लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर ठरल्या असून भाजपच्या भाग्यश्री शेटके यांचा लाटकर यांनी 11 मतांनी पराभव केला. शिवसेनेचे चार नगरसेवक महापौर- उपमहापौर निवडीला अनुपस्थित होते. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे ताराराणी आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेत वर्चस्व होते. पण पक्षीय राजकारण आल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची मोट बांधत सत्ता संपादन केली आहे. त्याला शिवसेनेचीही साथ मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूरमंजिरी लाटकर यांचे नाव कोल्हापूर महानगरपालिकेत महापौरपदासाठी निश्चित करण्यात आले होते. पक्षाच्या नगरसेवकांची राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक शासकीय विश्रामधाम येथे पार पडली होती. लाटकर यांच्या नावाला या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सत्ता फॉर्मुला कोल्हापूर महापालिकेत यशस्वी झाला, तो तसाच राज्यातही होईल असा विश्‍वास यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला होता. महापौरपदाची निवडणूक आज होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हीप लागू करण्यात आला होता. तसेच सर्वांना सहलीसाठी बाहेर पाठवण्यात आले होते.

Leave a Comment