महाशिवआघाडीच्या नेत्यांची आणि राज्यपालांची भेट रद्द


मुंबई : आज होणारी महाशिवआघाडीच्या नेत्यांची आणि राज्यपालांची भेट अचानक रद्द करण्यात आली आहे. आज राज्यपालांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भेटणार होते, पण ही भेट काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. ओल्या दुष्काळासंदर्भात महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार होते. तीनही पक्षांचे नेते त्यासाठी एकत्र जमणार होते, पण ही भेट ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे.

भेट रद्द झाल्याचे कारण शिवसेनेचे विधीमंडळातील नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदेंनी जारी केलेल्या पत्रकानुसार, आज दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ४.३० वाजता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार होते. पण, उपरोक्त तीनही पक्षांचे महत्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात असल्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. माननीय राज्यपाल महोदय यांची वेळ घेऊन भेटीची पुढील वेळ लवकरच कळविण्यात येईल, असे म्हटले आहे.

आज दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मागितली होती. तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते राजभवनावर जाणार, हे स्पष्ट नव्हते. पण तिन्ही पक्षाचे नेते पहिल्यांदाच उघडपणे एकत्र राज्यपालांची भेट घेणार होते, त्यामुळे या भेटीकडे राज्याचे विशेष लक्ष होते.

Leave a Comment