संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना ‘मी पुन्हा येईन’वरून टोला


मुंबई – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावे लागणार आहे. पुढील पाच वर्ष तुम्ही काय घेऊन बसलात. राज्यात पुढची २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही सारखे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे म्हणणार नाही. तसेच ये-जादेखील करणार नाही अणि कायम सत्तेत राहू, असे म्हटले आहे.

ओला दुष्काळ, पायाभूत सुविधा अशा बाबींवर आम्हाला अजून काम करावे लागणार आहे. जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत अनेक वर्ष ते सत्तेत होते. राज्य चालवण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. कोणतीही अडचण राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात येणार नाही. शिवसेनेच्या नेतृत्वातच पुढील सरकार हे येणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलता येणार नसल्याचे राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.

यशवंतराव चव्हाण यांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान होते. तसेच यात काँग्रेसच्याही अनेक नेत्यांचे मोठे योगदान आहे. आम्हाला महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. आतापर्यंत अनेक पक्षांचे राज्यात सरकार होते. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकसूत्री कार्यक्रम ठरवला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच सत्तेचा फॉर्म्युला ठरवतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भिन्न विचारधारांचे लोकांनी एकत्र येऊन यापूर्वी सरकार स्थापन केले होते. राज्याचा कारभार त्यानंतरही सुरळीत सुरू होता. उद्धव ठाकरे गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत. जर शेतकऱ्यांचे प्रश्न काही पक्ष एकत्र येऊन मांडत असतील तर त्यात त्यांचेच भले असल्याचेही राऊत म्हणाले.

Leave a Comment