राहुल गांधींच्या माफीनाम्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तंबी देत बंद केले मोदी अवमान प्रकरण


नवी दिल्ली – आज(बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर निर्णय दिला. त्याचबरोबर राहुल गांधीनी भविष्यात काळजीपुर्वक बोलावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने निर्णय राखून ठेवला होता. वकील मनू सिंघवी यांनी या खटल्यात राहुल गांधीची बाजू मांडली.

या वक्तव्यावर राहुल गांधीनी माफीही मागितली होती. असे वक्तव्य निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत नकळतपणे करण्यात आल्याचे म्हणत राहुल गांधीनी माफीही मागितली होती. तसेच याप्रकरणी राहुल गांधीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते आणि लेखी यांच्याकडून तक्रार दाखल झाल्यानंतर नोटीसही पाठवली होती. सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराप्रकरणीची कागदपत्रे तपासणीसाठी न्यायालयात आणण्याचे आदेश दिले होते. त्यावर राहुल गांधीनी असे म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून असे दिसते की चौकीदारानेच चोरी केली आहे.

राहुल गांधीनी यावरही न्यायालयाच्या निर्णयावर वक्तव्य करण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले होते. न्यायालयानेही यावर एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिले होते. पंतप्रधानांवर राफेल वादावरुन दिलेल्या निर्णयात कोणतेही वक्तव्य करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. पंतप्रधान मोदींची जनमानसात राहुल गांधी जाणूनबुजून प्रतिमा मलीन करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा राहुल गांधीनी चुकीचा अर्थ काढला, असे मिनाक्षी लेखी म्हणाल्या होत्या. राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर भाजपच्या एक प्रतिनिधीमंडळाने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती.

Leave a Comment