महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला केंद्राची मंजुरी


मुंबई: राज्यात सत्तेचा दावा करण्यात भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. तसे पत्रच राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले आहे. आता या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २० दिवस उलटले तरी कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यात यश आलेले नाही. आज रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत राष्ट्रवादी काँग्रेसलाही देण्यात आली होती. राज्यपालांना फोन करून सत्तेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी मागितला होता. संख्याबळ जुळवण्यात राष्ट्रवादी असमर्थ असल्याचेही अजित पवार यांनी राज्यपालांना म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांनी शिफारस केली असल्याची माहिती आहे. संविधानाच्या कलम ३५६ नुसार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केली आहे. संविधानाच्या कलम ३५६ नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. राज्यपाल कोश्यारी यांच्या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Leave a Comment