राज्यात स्थापन होणार महाशिवआघाडीचे सरकार


मुंबई – अखेर महाराष्ट्रात महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होणार असून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा निर्णय राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आल्यामुळे आता राष्ट्रवादी आपला पाठिंबा देणार हे देखील स्पष्ट झाले. दरम्यान, शिवसेनेचे प्रमुख नेते राजभवनावर दाखल झाले असून यामध्ये सचिन अहिर, प्रियंका चतुर्वेदी, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या भेटीत शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात शिवसेना नेते असल्याने राज्यपालांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात फोनवरून चर्चा झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रत्येक आमदारांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारपर्यंत महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा कायम होता. तो आता सुटला असून भाजपने नकार दर्शविल्याने राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा केली होती. पण शिवसेनेकडे बहुमत नसल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर अवलंबून राहावे लागले होते. त्यामुळे राज्यातील तिढा सुटण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनीही अहमद पटेल यांची भेट घेतल्यामुळे अंतिम निर्णय काँग्रेसचा होता. आता हा निर्णय आला आहे. बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्यामुळे शिवसेनेचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment