आता सत्तास्थापनेचा दावा करणार अभिजित बिचुकले


मुंबई : 16 दिवस महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. सत्तास्थापनेचा मार्ग भाजप शिवसेनेच्या महायुतीतील तिढ्यामुळे मोकळा होऊ झालेला नाही. दरम्यान आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात राज्यातील सर्व आमदारांना एक पत्र लिहिले आहे. राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना बिचुकले यांनी पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. आपण येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकलेंनी या पत्रात म्हटले आहेत. त्याचबरोबर जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा आणि मंत्रिमंडळामध्ये योग्य मंत्रिपदावर विराजमान व्हावे, असे देखील आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे.

अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. राज्यपालांकडे मी येणाऱ्या दोन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून बिचकुले यांनी निवडणूक लढवली होती. बिचुकले यांच्या आधी बीडच्या एका युवकाने देखील मुख्यमंत्री पदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाचा भार द्या, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती.

गेली 20 वर्षे मी स्वत: समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, आपणांस हे माहिती असेलच. विशेष म्हणजे 2004, 2009, 2014 आणि 2019 अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन लढविल्या आहेत. मी राष्ट्रपती पद मिळावे यासाठी देखील प्रयत्न केले होते. मी महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2019 साठी 182 वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरु, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना या पत्राद्वारे जाहीर आवाहन करतो की, आपण सर्वांनी मला आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वत;चे कसे आणि किती वेळा भले करुन घेतले आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. राज्यपालांकडे मी येणाऱ्या दोन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment