कधीही कोणाही समोर महाराष्ट्र झुकणार नाही – संजय राऊत


मुंबई – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असून राष्ट्रपती राजवट जर लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांना नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असे विचारले असता, नितीन गडकरी मुख्यमंत्रीपदाचे लेखी पत्र घेऊन येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

जर माध्यमांना महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असे वाटत असेल तर पारदर्शकता महाराष्ट्रात शिल्लक नसल्याचे म्हणावे लागेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. कधीही कोणाही समोर महाराष्ट्र झुकणार नाही. जसे कोणाही समोर शरद पवार झुकले नाहीत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर भाजपचा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. मातोश्रीवर शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे आले होते, त्यांना भेट नाकारण्यात आली का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हाही मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असल्याचेही सांगितले.

Leave a Comment