आमच्या आमदारांना भाजपकडून ५० कोटींची ऑफर ; विजय वडेट्टीवार


मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमच्या आमदारांवर दबाव आणत असून त्यांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आमच्या आमदारांना या संदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. ५० कोटींची ऑफर शिवसेना आमदारालाही दिल्याचा आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा काही केल्या सुटण्याचे नाव घेत नसतानाच आता आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी पक्षांनी केला आहे. महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे फोडाफोडीचा पॅटर्न रावबला जाऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर आमच्या इगतपुरीच्या आमदारांना भाजपकडून फोन आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी जे फुटणारे होते ते आधीच गेल्यामुळे आमचे आमदार फुटणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना सुरक्षेचा उपाय म्हणून फोन टॅप करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार फुटू नये म्हणून जयपूरला हलवण्यात आल्याच्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, की असे काही करण्यात आलेले नाही. जे आमदार गेले असतील ते पर्यटनासाठी गेले आहेत.

भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील काँग्रेसच्या आमदाराला २० कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आणखी कोणीही आम्हाला संपर्क केलेला नाही. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास असल्यामुळे ते कुठेही जाणार नसल्याचा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. मोदी-शहांचा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले तर, फोडाफोडीचे राजकारण केल्यामुळेच भाजपला जनतेने धडा शिकवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Leave a Comment