सरसंघचालकांचा फडणवीसांना शिवसेनेशी जुळवून घेण्याचा सल्ला


मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कलगीतुरा रंगला असतानाच, आता फडणवीसांना हा मोलाचा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक आटोपल्यावर तातडीने नागपुरात सरसंघचालक भागवत यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्र्यांनी या भेटीत उद्भवलेल्या राजकीय स्थितीवर भागवत यांच्याशी चर्चा केली. भागवतांनी या चर्चेत शिवसेनेसोबतच जुळवून घेण्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री या भेटीनंतर पुन्हा मुंबईला परतले असून राजकीय कोंडी सोडवण्याचा आजच प्रयत्न करणार आहेत.

सोमवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांचीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली असून दिल्लीतून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासह एक मलाईदार खाते देण्याची मंजुरी मिळवली आहे. पण अजूनही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपकडून शिवसेनेसमोर झुकल्याचे चित्र निर्माण होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच भाजपचा एकही नेता अद्याप मातोश्री वर दाखल झाला नाही. तसेच मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देता कामा नये, अशी भूमिकाही भाजपने घेतली आहे. पण कोंडी फोडण्यासाठी राजकीय नेत्यांऐवजी अन्य व्यक्ती कडून मदत घ्यावी, अशा सूचनाही दिल्लीतून करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेशी येत्या दोन दिवसात संपर्क करून शिवसेनेला सोबत घेऊनच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी करावा, असे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. तर शपथविधी शिवसेनेला डावलून उरकल्यास दोन्ही पक्षातील संबंध अधिकच चिघळतील, अशी भीतीही भाजपच्या काही नेत्यांना आहे.

Leave a Comment