नवी दिल्ली : गेल्या 14 दिवसांपासून शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेच्या मागण्या भाजपकडून अमान्य होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत शिवसेना सत्तास्थापन करु शकते अशा शक्यता बळावल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले असून भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाऊ नये. तसे केल्यास हा आत्मघातकी निर्णय ठरले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना मी आवाहन करेन की, त्यांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देऊ नये.
आठवले म्हणाले की, महायुतीच्या बाजूने राज्यातील जनतेने कौल दिला आहे. जनतेने महायुतीसाठी मतदान केले असल्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी राज्यातील जनतेच्या मताचा आदर करावा. सत्तास्थापनेसाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये.
आठवले म्हणाले की, शिवसेनेने आपली आडमुठेपणाची भूमिका सोडत मुख्यमंत्रीपदाची मागणी करणे थांबवावे. मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेनेने सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यावे. 50-50 चा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेबाबत ठरवण्यात आला होता. परंतु 50-50 चा फॉर्म्युला म्हणजेच एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्याला उपमुख्यमंत्रीपद असा होतो.