आढळराव पाटलांची गिरीष बापटांना शकुनीमामाची उपमा


पुणे – युतीधर्म गिरीष बापट यांच्यामुळे न पाळला गेल्यामुळे पराभवाचा सामना शिवसेनेला करावा लागला आहे. पुणे जिल्ह्यात त्यांनीच शिवसेनेला संपवले, पुणे जिल्ह्यासाठी हे गिरीश बापट ‘शकुनीमामा’असल्याची घणाघाती टीका माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर-शिरूर-खेड या मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकला होता. पण शिवसेनेला यावेळी मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. आढळराव पाटील यांनी या अपयशाचे खापर गिरीष बापट यांच्यावर फोडले आहे. खासदार गिरीष बापट म्हणजे पुणे जिल्ह्यातील शकुनीमामा असून शिवसेनेला या शकुनीमामाने संपवले. मी पालकमंत्र्यांना पत्र द्यायचो, पण त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय मला येत नव्हता. पण काम मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच पदाधिकारी यांच्या नावाने पत्र द्यायची. अशा प्रकारे यांनी जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम केले, या शब्दांत चाकण येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना पाटील यांनी गिरीष बापट यांच्यावर टीका केली.

Leave a Comment