पुणे – येत्या काही दिवसात संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता असून कायदा सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर टिकवण्यासाठी आजपासून (५ नोव्हेंबर) राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्टया, रजा रद्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी न्यायालयाच्या निकालानंतर सोशल मीडियात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत सोमवारी पुणे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
पोलिसांनी नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चांगल्या अथवा वाईट अशा कोणत्याही स्वरुपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात टाकू नयेत, असे आवाहन केले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियातून टीकाटिपणी, पत्रकबाजी करणे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी ठरू शकते. यामुळे यावर सोशल मिडियातून प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
रामजन्मभूमी व बाबरी मस्जिद या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या काही दिवसांमध्ये निकाल अपेक्षित आहेत. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. सर्व भारतीय जनतेचा त्याच्यावर विश्वास आहे. तरी सर्व भारतीय नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पाळणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी काही सूचना केल्या असून या सूचनांचे पालन करावे असे पोलिसांनी आवाहन केले आहे. त्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
त्यानुसार जमाव करून थांबू नये. तसेच सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करू नयेत. निकालानंतर गुलाल उधळू नये. फटाके वाजवू नयेत. सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत. तसेच महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये. निकालानिमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत. घोषणाबाजी जल्लोष करू नये त्याचबरोबर मिरवणुका रॅली काढू नये. भाषणबाजी करू नये. कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये. कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये.
सर्वोच्च न्यायालयाचा सदरचा निकाल हा केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल. तरी वरील सूचनांचे पालन न केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहितेनुसार कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये कलम २९५, कलम २९५ (अ), कलम २९८ बरोबरच इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सुचनांचे पालन केल्यास या कलमांअंतर्गत होऊ शकते कारवाई
- कलम २९५ – कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.
- कलम २९५ (अ) – कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.
- कलम २९८ – धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे.