लवकरच स्थापन होईल नवीन सरकार – देवेंद्र फडणवीस


मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर नवीन सरकार स्थापनेवर कोण काय बोलले आहे, यावर भाष्य करण्याची इच्छा नाही. तर मला एवढेच सांगायचे आहे, मला विश्वास आहे नवीन सरकार लवकरच स्थापन होईल, असे वक्तव्य केले आहे. आज दिल्ली येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाली. राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर केंद्र सरकारने मदत करावी, यासंबंधित ही बैठक झाल्याची माहिती आहे. पण राज्यातील सत्ता स्थापनेबाबत बैठकीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा स्पष्ट खुलासा त्यांनी केला नाही.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुकतेच 10 हजार कोटीं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर केले आहेत. पण दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने यासाठी यात लक्ष घालावे, ही भेट यासाठी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच बरेच दिवस विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून झाले आहेत. पण भाजप-शिवसेना दोनही पक्षांमध्ये अजून ही मुख्यमंत्री पदावरून तणाव निर्माण झाला आहे. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहा यांच्यासोबत सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, दोघांनीही याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही.

Leave a Comment